संत चोखामेळा अभंग
₹25.00
संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म : अज्ञात वर्ष; मृत्यू : इ.स. १३३८) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते. (चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात.)
चोखोबा मूळ वऱ्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. चोखॊबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.
संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्ऱ्या, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.
चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ … असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.
संस्कारसंपन्न, संवेदनक्षम संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो.
१४व्या शतकात संत चोखोबा मातीखाली गाडले गेले. आज त्यांच्या समाज बांधवानी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे संत चोखोबांच्या अभंगांचे पारायण कोणीही करत नव्हते. अशा परिस्थितीत वारकरी साहित्य परिषदेने संत चोखोबांच्या अभंग गाथा पारायणास मंगळवेढा जि.सोलापूर येथे सन २०१३मध्ये थाटामाटाने सुरुवात केली.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.